Friday, December 2, 2011

८४ वा कार्यक्रम वृत्तांत

योगसाधना आणि ताणतणाव व्यवस्थापन

“आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली”चा ८४ वा कार्यक्रम नुकताच शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०११ रोजी महावीरनगर - कांदिवली स्थित सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान येथे सपन्न झाला. २६.११ हा तीन वर्षांपुर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेक हल्ल्याचा काळा स्मृतिदिन. शिवाय ज्या वीरांनी आपल्या अतुलनीय धैय - शौर्याने या हल्ल्याचा सामना करुन आपल्याला भयमुक्त केल त्या वीरांचे व हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधुन कार्यक्रमाच्या सुरवातीला शहिदांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन वीर शहिदांना पुष्पांजली वाहण्यात आली.

यावेळी ’संवाद’ या चर्चात्मक कार्यक्रमात “पवारांवरील हल्ल्यावर अण्णा हजारेंनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया” या विषयावर झालेल्या मुक्त चर्चेत हिरीरीने सहभागी होताना सहभागी-सभासदांनी मतमतांतरे व्यक्त केली. या साधकबाधक चर्चेनंतर शेवटी असा सूर निघाला की, “श्री. अण्णा हजारे हे मर्यादित स्वरुपात गांधीवादी आहेत. त्यांनी सर्वसामान्यांचे मत व्यक्त केले. एवढे मात्र खरे की नेत्यांनी - राजकारण्यांनी आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.”

याआधी मुख्य कार्यक्रमात “योगसाधना आणि ताणतणाव व्यवस्थापन” या विषयावर बोलताना योगशिक्षक श्री. मनोहर जोगळेकर यांनी “ताणतणावापासुन मुक्त होणे कठिण असले तरीही योगाभ्यासाने या ताणतणावांचे नीट व्यवस्थापन करुन यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासुन दूर राहता येते.” हा मुलमंत्र दिला. अष्टांग राजयोगाची आठ अंगे विशद करताना यातील काही आसनांची प्रात्यक्षिके करुन दाखविली व उपस्थितांकडुनही करुन घेतली. चार बंध आणि प्राणायामाचे सोपे २-३ प्रकार दाखवुन तेही उपस्थितांकडुन करुन घेतले. उपस्थित सहभागी-सभासदांनी या कार्यक्रमामुळे योगाभ्यास, व्यायाम व शिस्त यांचे आपल्या जीवनातील महत्व अधोरेखित झाल्याची कबुली देताना कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रामाचे शेवटी २६.११ सह सर्वच ज्ञात-अज्ञात वीर शहिदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली.

शब्दांकन : प्रा. प्रेमानंद सामंत व राजेश जी. गाडे

No comments: