Friday, November 18, 2011

मैत्र जीवनाचे... (८३वा कार्यक्रम : शनिवार, दि. १२.११.२०११)

मैत्र जीवनाचे... (८३वा कार्यक्रम : शनिवार, दि. १२.११.२०११)

१४ नोव्हेंबरला देशभरात उत्साहात साजऱ्या झालेल्या “बालदिना”च्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०११ रोजी आपल्या अत्रे कट्ट्यावर “मैत्र जीवनाचे...” या परिवारातील सहभागी-सभासदांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस साजरे करण्याचा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तरुण मंडळी, भगिनी व ज्येष्ठ नागरिक अशा सर्ववयीन सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात सभासदांच्या सहभागामुळे उत्तरोत्तर रंगत चढत गेली. सूत्रसंचालक व अत्रे कट्टा, कांदिवलीचे मुख्य संयोजक राजेश गाडे यांनी माणसाच्या आयुष्यातील “वाढदिवसा”चे महत्व विषद करताना “वयाने, अनुभवाने व सर्वांगाने वाढवत नेणारा आणि म्हणुन जीवनानंद देणारा असा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार महत्वाचा असा वार्षिक उत्सव” अशी वाढदिवसाची सहजसोपी व्याख्या सांगुन कार्यक्रमाची खुमासदार सुरवात केली. प्रा. प्रेमानंद सामंत यांनी यावेळी वाढदिवसाचे महत्व, वाढदिवस साजरा करण्याच्या जगभरातील वेगवेगळ्या पद्धती व समजुती, काही अंधश्रद्धा ह्यांचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाची लय लक्षात घेऊन केलेल्या आवाहनाला अनुसरुन वयाची पन्नाशी पुर्ण करणारे व कार्यक्रमाचे विशेष उत्सवमूर्ती असणारे अशोक बिंड यांचेसह प्रकाश परब, सदानंद सुरावकर, श्याम पाठक, रघुनंदन हुकेरीकर, आवळस्कर आदी मंडळींनी आपले वाढदिवसाचे व लग्नाच्या वाढदिवसाचे मजेशीर, गंमतीपर व काहीशे गंभीर अनुभव कथन करुन कार्यक्रमात रंगत भरली. यावेळी आणखी एक उत्सवमूर्ती डॉ. सी.पी. सिंग यांनी आचार्य अत्रे व बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यासोबत घडलेला आपला प्रत्यक्षानुभव सांगुन उपस्थितांना सदगदीत केले.

कार्यक्रमाची प्रासंगिकता व विषयाला अनुसरुन झालेल्या खुल्या चर्चेत ’सध्या प्रचलित असलेली व पाश्चिमात्यांकडुन घेतलेली केक कापण्याची व केक कापताना मेणबत्त्या फुंकण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत बसत नसल्याचा’ सार्वत्रिक सूर परखडपणे ऐकायला मिळाला. यानुषंगाने “वाढदिवस साजरा करताना सरत्या वर्षाच्या मेणबत्तीला फुंकर मारुन येणाऱ्या वर्षाची मेणबत्ती प्रज्वलित करायची” ही व्यवहार्य वाटणारी सूचना स्विकारची किंवा नाही याचा निर्णय आपपल्या परीने घेताना “दुसऱ्या संस्कृतीतील गोष्टींचे अनुकरण करताना आपल्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टींना तिलांजली दिली जाणार नाही” याचीही योग्य ती दखल घेतली जावी” यावर उपस्थितांचे एकमत जाणवले. मगच ती प्रथा प्रचलित करावी, यावर बहुतांशी - उपस्थितांचे एकमत जाणवले. वेगळ्या संकल्पनेतुन साकार झालेल्या या आगळ्या कार्यक्रमाविषयी सभासद व उत्सवमूर्तींनी विशेषत: वासंती शुक्ल, गणेश ठाकूर, दयानंद शानबाग आदींनी विशेष समाधान, आनंद व आभार व्यक्त केले.

शेवटी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ’वाढदिवस सोहळ्या’त परिवारातील महिला सभासदांनी वाढदिवस साजरा केला जाणाऱ्या उत्सवमूर्तींसह सर्वच उपस्थित सभासदांना ओवाळुन औक्षण केले. त्याला ज्येष्ठ सभासद कुडतरकर (बापूजी) यांनी’जीवेत शरद: शतम’ हे स्वरचित गीत गाऊन उत्तम साथ दिली. उत्सवमूर्तींना यावेळी वाढदिवसानिमित्त “तुळशीचे रोप” भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश व शुभेच्छा देण्यात आल्या. पेढे भरवुन व वाटुन कार्यक्रमाची गोडशी सांगता झाली.
-       शब्दांकन : प्रा. प्रेमानंद सामंत व राजेश जी. गाडे

No comments: